राज्यातल्या सर्व शाळा आता सकाळी 9 नंतर भरणार आहेत.महाराष्ट्र शासनाने असा शासन निर्णयच जारी केला आहे.यापूर्वी राज्यातल्या काही शाळा ह्या सकाळी 7 वाजता तर काही शाळा 7 नंतर पण सकाळी लवकरच भरत होत्या.खास करून खाजगी शाळा ह्या सकाळी लवकर भरत होत्या.त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन या विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतची सर्व शाळा आता सकाळी सात वाजता भरवल्या जाणार नाही. व यामागील कारणही स्पष्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांना इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 7 वाजता न भरवता 9 वाजेनंतर भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यपाल रमेश बैस यांनी 5 डिसेंबर 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात याबाबत महत्त्वाची सूचना केली होती. त्यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा करण्यात आली तेव्हा अशा काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा विद्यार्थ्यांच्या झोपेचा होता. विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने अभ्यास करण्यात अडचण निर्माण होत होती, असं पालकांचं मत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अभ्यास करुन याबाबत सर्व शाळांना महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.
समितीच्या चर्चेतून कोणत्या बाबी समोर आल्या आहेत
१. राज्यातील सर्व शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याच्या दिसून आल्या.
२. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.
३. पालकांच्या मते मुलांची झोप पूर्ण न झाल्याने सकाळी शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.
४. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा शिकण्यासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिकवण्यावर होतो.
५. हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. व ते नेहमी आजारी पडतात.
६. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते.
७. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस याचाही त्रास होतो
८. यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
९. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा.
३. उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ किंवा ९ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत:-
अ) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ वाजताच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी.
ब) शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा – २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.
क) ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी.
४.३ मधील सुचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी घ्यावी.
शासन निर्णय
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.